Translate

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

किल्ला नांदगिरी

किल्ला नांदगिरी

    सातारा शहरापासून नांदगिरी हा अत्यंत जवळचा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून १,०७८ मी. उंचीवर हा किल्ला वसलेला आहे. पायवाटेने गडाकडे जाताना काही पायऱ्या चढल्यावर वाटेत बौध्दकालिन एक गुहा लागते. गुहेमध्ये एका खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराने आत जाताना समोर एक भव्य कातळ भिंत दिसते. तेथून पायऱ्यांनी खाली उतरल्यावर जलमंदिर दिसते. हे जलमंदिर नांदगिरी किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे. गडावरील दुसऱ्या प्रवेशद्वाराने पुढे गेल्यावर हनुमानाचे मंदिर लागते. येथील हनुमानाची मूर्ती लहानसा असून येथे पाण्याचे तळे व दगडी वृंदावन आहे. गडावरून ज्र्ण्देश्व्राचा डोंगर, अजिंक्यतारा गड व यवतेश्वर इ. परिसर दिसतो. नांदगिरी किल्ला हा शिलाहार भोज राजाने बांधला. १६७३ मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. १७०१ मध्ये या किल्ल्यावर स्वारी करून ओरंगजेबाने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता; परंतु मराठ्यांनी तो पुन्हा युद्ध करून जिंकला. अनेक वर्षे या किल्ल्याचा ताबा पंतप्रतिनिधींकडे होता. १८१८ मध्ये ब्रीतीशांनी या किल्ल्यावर ताबा मिळविला. नांदगिरी किल्ला हा ‘कल्याणगड’ या नावाने ओळखला जातो.   

किल्ला सज्जनगड

किल्ला सज्जनगड

समर्थ रामदासांचा निवास आणि समर्थांची समाधी असलेला एक ऐतिहासिक आणि पवित्र गड म्हणजे सज्जनगड. समुद्र सपाटीपासून ९८१ मी उंचीवर असलेला हा किल्ला सातारा जिल्ह्यात असून अजिंक्यतारा किल्ल्याच्या जवळ हा किल्ला आहे. गडावर जाताना सुरवातीला छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार लागेत. नंतर दुसरा महादरवाजा लागतो. प्रवेशद्वाराच्या बाजूला वीर हनुमान आणि वराहमुर्ती आहे. गडावर समर्थांना सापडलेल्या आंग्लाई देवीच्या मूर्तीचे मंदिर आहे. तसेच एक मोठा तलाव असून त्याला घोडाळे तलाव असे नाव आहे. श्रीधर कुठी, सोनाळे तळे व मुख्य म्हणजे राम मंदिर याचे दर्शन घडते. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. तलघरामध्ये समर्थांची समाधी आहे. समाधीवर सुंदर मेघडंबरी असून समर्थांच्या पादुकांचेही दर्शन गडावर घडते. मंदिराच्या जवळच समर्थांचा मठ तसेच समर्थ वापरीत असलेले सामानही आपल्याला बघायला मिळते. त्यात प्रामुख्याने पलंग, पिकदाणी, पानाचा दबा, पाण्याचा लोटा व तलवार लपविलेली कुबडी इ. वस्तू आहेत. गडावरील तटाच्या रक्षणासाठी समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचेही दर्शन घडते. साज्ज्न्गादाचे पूर्वीचे नाव ‘आश्वलायन गड’ असे होते. तसेच परळीचा किल्ला म्हणूनही हा किल्ला ओळखला जात असे. १६६२ मध्ये आफ्जाखानाचा मुलगा फाजलखान हा गडाचा किल्लेदार होता. एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर समर्थ या किल्ल्यावर वास्तव्यास आले व संत सज्जनांच्या वास्त्व्याने पुनीत झाल्यामुळे या किल्ल्याचे नाव सज्जनगड असे पडले.

किल्ला राजगड

किल्ला राजगड

राजगड हा महत्वाचा डोंगरी किल्ला असून शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांची सुरवातीची राजधानी राजगड या किल्ल्यावर होती. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वेल्हे गावापासून आग्नेयेला साधारण १६ कि. मी. अतंरावर हा किल्ला आहे. राजगडाची समुद्र सपाटीपासून उंची १,३७६ मी. आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे या गावापासून पायवाटेने गडावर जाता येते. या गावापासून राजगडाचा चढ सुरु होतो. ही वाट हत्ती, घोडे किंवा वाहन जातील इतकी रुंद आहे. गडाच्या उत्तरेला पद्मावती, आग्रेयेला सुवेळा आणि नैऋत्येला संजीवनी अशा तीन चिलखती म्हटले जाते. किल्ल्यावर येण्यासाठी गुंजपा, पाली, आळू आणि काळेश्वरी असे चार दरवाजे आणि तीन दिंड्या आहेत. पद्मावती हि माची बरीच मोठी असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती या माचीवर होती. तसेच सुवेळा, संजीवनी आणि बालेकिल्ला यावरही वस्ती होती. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबासह बालेकिल्ल्यावर राहत असत. या गडावरची मुख्य देवता पद्मावती ही आहे. तिचे मंदिर पद्मावती माचेवर आहे. या तेनही माच्या आणि बालेकिल्ल्यावर गणेश, मारुती, ब्रहार्षी, काळेश्वरी आणि भागीरथी याची लहान मोठी मंदिरे आहेत. याशिवाय दारूखाना, दिवाणघार, राजवाडा आणि पागा या वास्तूही तेथे आहेत. प्रत्येक माचीवर पाण्याची व्यवस्था आहे. शिवाजी महाराजांनी अनेक गड ताब्यात घेताना त्यात मुरमदेव हा गड ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव दिले. तिथे आपली राजधानी वसविली. शिवाजी महाराजांची राजधानीच असल्यामुळे या किल्ल्यावर अनेक खलबतं होऊन अनेक ल्धायांचे निर्णय आणि विजयोत्सव साजरे केले गेले. अशा तऱ्हेने राजगड हा महत्वाचा इतिहासाचा साक्षीदार आहे.

किल्ला वैराटगड

किल्ला वैराटगड

वाई – सातारा मार्गावरील पाचवड गावाजवळ वैराटगड हा ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून १,२०० मीटर उंचीवर असलेला हा गड सह्याद्रीच्या उपरांगेवर आहे. या गडाचे वैशिष्ट म्हणजे सुमारे ९ मीटर उंचीची कातळाची नैसर्गिक तटबंधी या किल्ल्याला लाभली आहे. तसेच या गडाचे आकारमानही प्रशस्त आहे. गडावर पाण्याची टाकी असून हनुमानाचे एक मंदिर आहे. तसेच वैराटेश्वर महादेवाचे मंदिरही असून मंदिराबाहेर तुळशी वृंदावन व नंदी आहे. मंदिराजवळ एक मठ आहे. गडाच्या पश्चिमेकडे टोकावर तटबंदीने सुरक्षित केलेली माची आहे. गडावर तत्कालीन घरांच्या खुणा आणि पाण्याच्या कोरड्या टाक्या दिसतात. वैराटगडाच्या माथ्यावरून मांढरदेवीचा डोंगर, कमळगड, रायेश्वर व पांडवगड इत्यादींचे दर्शन होते. वैराटगड हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज याने निर्माण केला. इ. स. ११७८ ते ११९३ या काळात राजा भोजने अनेक गड बांधले. त्यापैकी हा एक गड आहे. कोणे एकेकाळी या परिसरात विराट नावाची जमात राहत होती. त्यांच्या वस्तीमुळे या गडाला वैराटगड हे नाव पडले असे मानले जाते. 

किल्ला हडसर

किल्ला हडसर

पुणे जिल्यातील जुन्नर जवळ हडसर पर्वतयेथे हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून १,०२८ मी. उंचीवर हा किल्ला असून या किल्ल्याला नैसर्गिक कड्याची उभी तट­­­बंदी आहे. जुन्नरहून जवळच हडसर हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. गडाचा दरवाजा सुध्दा एक अखंड कातळ खोदून केलेला दिसतो. दुसरा दरवाजाही कातळातच खोदलेला असून हे दोन्ही दरवाजे म्हणजे त्यावेळच्या वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. बोगद्यासारख्या खोदलेल्या मार्गाने पुढे गेल्यावर धान्य कोठार लागते. किल्ल्यावरील तीन प्रसस्थ गुहारी वैशिष्टपूर्ण आहेत. गडावर शंभू महादेवाचे मंदिर असून मंदिरातील गणपती व गरुड मूर्ती अत्यंत सुंदर आहे. मजबूत आणि उत्तम बांधकामाचा प्रकार पाहता सातवाहनांनी तो बांधला असावा असे वाटते. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांच्या ताब्यात देलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होय. नाणे घाट मार्गावरून येणाऱ्या शत्रूला थोपविण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होता. कातळ भिंतीमुळे वैशिष्टपूर्ण ठरलेला हडसर तथा पर्वतगड हा किल्ला इतिहास काळातील आपले वेगळेपण जपून होता. 

किल्ला जीवधन

किल्ला जीवधन

जुन्नर जवळ असलेल्या स्वराज्याच्या निर्मीतीतील एक म्हणजे जीवधन किल्ला. नाणेघाटाच्या मोक्यावर असलेल्या या गडाची समुद्र सपाटीपासून ११४५ मी. उंची आहे. जुन्नरपासून जवळ असलेल्या घाटघर गावातून किल्ल्यावर जाता येते. जीवधन किल्ल्याकडे जाणारी वाट हि अवघड आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गजांतलकलक्ष्मीचे शिल्प आहे. पाण्याच्या दोन टाक्या व उत्तम बांधलेली धान्यकोठी दिसते. पुढे गेल्यावर जीवाबाईची मूर्ती आणि वृंदावनाचे दर्शन होते. गडावरून हडसर, कळसुबाई, रतनगड व हरिश्चंद्रगड दिसतात. जीवधन किल्ल्याचे वैशिष्ठ म्हणजे वांदरर्लिंगी किवा खडापारशी हे सुळके होत.
या सुळक्याच्या व गडाच्या मध्ये खोल दरी आहे. शहाजी राज्यांच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने जीवधन हा महत्वाचा किल्ला आहे.निजामशाहीच्या विरोधी राजकारण याच गडावर घडले. निजामशाहीचा अस्त झाल्यावर निजामशाहीचा वंशज मुर्तीजा यांस याच गडावर कैद केले होते. शहाजी राजांनी मुर्तीजाला सोडवून निजामाच्या गादीवर बसवले. हा सर्व इतिहास याच गडाच्या साक्षीने झाला. इंग्रजांनी १८१९ मध्ये मराठ्यांचा पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला. या युद्धाच्या वेळी केलेल्या तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचे अतोनात नुकसान झाले. त्याच्या खुणा आजही दिसतात.

किल्ला घोडबंदर

किल्ला घोडबंदर

ठाणे जिल्यातील उल्हास नदीच्या खाडीजवळ घोड्बंदरचा किल्ला आहे. उल्हास नदीच्या तीरावरील डोंगर रांगेच्या खाडीपर्यंत पसरलेल्या सोंडेच्या शेवटी हा किल्ला बांधण्यात आला आहे. येणाऱ्या जाण्याऱ्या गलबतांवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. घोडबंदरच्या वस्तीकडून किल्ल्याकडे जाताना अगोदर गव्हर्नरचा बंगला लागतो. तेथून पुढे सुमारे ९० पायऱ्या चढून गडावर जाता येते. गडावरील अनेक कमानी अत्यंत आकर्षक आहेत. गडावर एक दरबाराचे सभागृह आहे. गडावर बांधलेले बुरुज हे गडाचे वैशिष्ठ आहे. गडावरून उल्हास नदीचे पात्र फार नयनरम्य दिसते.
पोर्तुगीजांच्या ताब्यातील घोडबंदर किल्ला जिंकण्यासाठी छत्रपतींनी प्रयत्न केला होता व अखेर १७३७ मध्ये मराठ्यांचा झेंडा या किल्ल्यावर फडकला. हा किल्ला परत घेण्यासाठी पोर्तुगीजांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. पुढे १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला. घोडबंदर हा छोटासा किल्ला असला तरी त्याची डागडुजी करून त्याला पुन्हा पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्याचे प्रयत्न पुरातत्व खात्याकडून केले जात आहेत.