किल्ला डहाणू
ठाणे जिल्यातील
डहाणू गावातील हा किल्ला प्राचीन किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. डहाणू हे निसर्गरम्य
असे प्रसिद्ध बंदर आहे. डहाणू खाडीच्या मुखाजवळ हा किल्ला असून या किल्याला १५
मिटर उंचीची तटबंदी आहे. गडावर प्रवेश केल्यावर ध्वजस्तंभ असलेला बुरुज लक्ष वेधून
घेतो. या बुरुजाकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. हा किल्ला खूप जुना असून सध्या
येथे सरकारी कचेरी असल्यामुळे किल्याची एकूण अवस्था फारशी चांगली नाही. १५३३ मध्ये
पोर्तुगीजांनी डहाणू बंदर ताब्यात घेतले तेव्हा येथे कोट बांधला. १५८२ मध्ये
मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेताना प्रयत्न केला होता. पोर्तुगीज कॅप्टन
नोसासेन्होरा याने हा किल्ला नव्याने बांधून मनोरे, तटबंदी व भक्कम बुरुज केले.
पेशवेकाळात मराठ्यांनी स्वारी करून राणोजी शिंदे याने १७३९ मध्ये डहाणू जिंकले.
काहीकाळ डहाणूवर इंग्रजांचा ताबा होता व पुन्हा त्याचा ताबा मराठ्यांकडे आला आणि
१८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या तहामुळे डहाणू किल्ला पुन्हा ब्रिटिशांच्या
ताब्यात गेला. १८८८ पासून सरकारी कचेरी येथे सुरु झाली व ती स्वातंत्र्यानंतर आजही
आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा