किल्ला वैराटगड
वाई – सातारा मार्गावरील
पाचवड गावाजवळ वैराटगड हा ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून १,२०० मीटर
उंचीवर असलेला हा गड सह्याद्रीच्या उपरांगेवर आहे. या गडाचे वैशिष्ट म्हणजे सुमारे
९ मीटर उंचीची कातळाची नैसर्गिक तटबंधी या किल्ल्याला लाभली आहे. तसेच या गडाचे
आकारमानही प्रशस्त आहे. गडावर पाण्याची टाकी असून हनुमानाचे एक मंदिर आहे. तसेच वैराटेश्वर
महादेवाचे मंदिरही असून मंदिराबाहेर तुळशी वृंदावन व नंदी आहे. मंदिराजवळ एक मठ
आहे. गडाच्या पश्चिमेकडे टोकावर तटबंदीने सुरक्षित केलेली माची आहे. गडावर
तत्कालीन घरांच्या खुणा आणि पाण्याच्या कोरड्या टाक्या दिसतात. वैराटगडाच्या
माथ्यावरून मांढरदेवीचा डोंगर, कमळगड, रायेश्वर व पांडवगड इत्यादींचे दर्शन होते. वैराटगड
हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज याने निर्माण केला. इ. स.
११७८ ते ११९३ या काळात राजा भोजने अनेक गड बांधले. त्यापैकी हा एक गड आहे. कोणे
एकेकाळी या परिसरात विराट नावाची जमात राहत होती. त्यांच्या वस्तीमुळे या गडाला वैराटगड
हे नाव पडले असे मानले जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा